Monday, 1 June 2015

सावरकरांनी कधीही क्षमायाचना केली नाही --रणजित सावरकर

( लोकमत दि.१९/१/२०१४ ला प्रसिद्ध)
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपले संपूर्ण आयुष्यच देशासाठी व्यतीत केले. ज्या काळात वसाहतीचे स्वातंत्र्य मागण्यास देखील भारतीय नेते कचरत होते, तेव्हा संपूर्ण स्वातंत्र्य हेच ध्येय असल्याचे प्रकटपणे घोषित करून ‘स्वातंत्र्यलक्ष्मी की जय’ ही घोषणा प्रचारात आणणारे सावरकरच होते. अंदमानमध्ये यमयातना भोगणार्‍या या अलौकिक देशभक्ताची स्वतंत्र भारतात मात्र सदैव उपेक्षाच झाली. हेही कमीच झाले असे वाटून काही महाभागांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिश सरकारची माफी मागितली, असा धादांत खोटा आणि अपमानास्पद प्रचार सुरू केला. वस्तुत: स्वा. सावरकरांनी कधीही क्षमायाचना केलेली नाही. याबद्दल कुठलाही पुरावा नाही. पुरावा म्हणून दाखविण्यात येणारे सप्टेंबर १९१४ चे पत्र संपूर्ण वाचले तर हे लक्षात येईल, यात दया, क्षमा अथवा माफी असा शब्ददेखील नाही.
१९0९ मध्ये बर्लिनमधून प्रसिद्ध होणार्‍या तलवार नावाच्या क्रांतिकारकांनी चालवलेल्या मुखपत्रात सावरकरांनी एका लेखात लिहिले होते ‘‘थोड्याच वर्षांत इंग्लंड-र्जमन असे युद्ध सुरू होईल. भारताला स्वातंत्र्य मिळवता येईल. क्रांतिकारकांनी आतापासून तयारी सुरू करायला हवी, अशी सुवर्णसंधी शतकातून एखादी मिळते, पुन:पुन्हा नाही.’’ या योजनेनुसारच १९१४ मध्ये अभिनव भारताच्या क्रांतिकारकांनी अन्य क्रांतिकारकांच्या मदतीने युरोपीय हिंदी स्वातंत्र्य समिती (बर्लिन-समिती) स्थापन केली. बर्लिन-समितीला एका कराराद्वारे हिन्दुस्थान स्वतंत्र झाल्यावर परतफेडीच्या अटीवर र्जमन सरकारने अर्थसाहाय्यही केले. या समितीनेच काबूलमध्ये भारताचे पहिले निर्वासित सरकार बनविले आणि गदर कटातही सक्रिय सहयोग दिला. 
या पार्श्‍वभूमीवर लिहिलेले स्वा. सावरकरांचे पत्र मुळातूनच संपूर्णपणे वाचण्यासारखे आहे. महायुद्धाच्या कोंडीत सापडलेल्या इंग्रजांकडे त्यांनी ‘‘देशाला वसाहतीचे स्वातंत्र्य देऊन राजबंदिवानांना सोडल्यास भारतीय क्रांतिकारक शस्त्रसंधीसाठी तयार होतील,’’ असा प्रस्ताव अत्यंत मुत्सद्देगिरीने मांडला होता. याच पत्रातील ‘वाटले तर मला न सोडता इतर क्रांतिकारकांना सोडण्यात यावे’ हे वाक्य यात सावरकरांचा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नसल्याचेही स्पष्ट करते.
ब्रिटिश कायद्यानुसार अंदमानमध्ये कैद्यांना सहा महिन्यानंतर बाहेर काम करण्यासाठी पाठवीत असत. कैदी जरा शिकलेला असला तर त्याला लिपिकाचे काम देत; परंतु सुशिक्षित क्रांतिकारकांना मात्र कोलूला जोडत असत. दीड वर्षांनंतर सावरकरांनी नियमाप्रमाणे इतर कैद्यांप्रमाणे त्यांनाही कामासाठी तुरुंगाबाहेर पाठविण्यात यावे, असे निवेदन दिले. (या निवेदनाचा हेतुपूर्वक चुकीचा अर्थ घेऊन सावरकरांनी दीड वर्षातच सुटकेसाठी अर्ज करणे सुरू केले असा खोडसाळ 
प्रचार करण्यात येतो) या निवेदनावर सरकारने उत्तर दिले की,‘‘तुमचा पूर्वेतिहास भयंकर असल्याकारणाने तुम्हाला सवलत देता येत नाही.’’ क्रांतिकारकांनी आपला संघर्ष तीव्र केल्यावर माघार घेत सरकारने क्रांतिकारकांनाही कामासाठी बाहेर धाडण्याची 
मागणी मान्य केली. पुढे स्वत:चे अन्न शिजविण्याची परवानगीही देण्यात आली. बहुसंख्य क्रांतिकारकांना ३-४ वर्षांतच भारतात परत धाडण्यात आले. 
परंतु सावरकरांना यातील एकही सवलत न देता, 
सतत दहा वर्षे कोठडीत बंद करून ठेवण्यात आले. 
ते शेवटचे ३-४ महिने तेल गोदामाचे मुकादम 
असताना देखील त्यांना रात्री कोठडीबंद करण्यात 
येत होते. या काळात त्यांना क्षुल्लक अपराधांसाठीही खडा-बेडी (रोज बारा-बारा तास याप्रमाणे ८-१५ दिवस भिंतीशी बेडीत जखडून टांगणे), दंडा-बेडी (१५-१५ दिवस बेडीत हात पाय जखडून ठेवणे), कोलू, एकांत कोठडी अशा असंख्य अमानवी शिक्षांना सामोरे जावे लागले.
केंद्रीय विधिमंडळात विठ्ठलभाई पटेल यांनी सर्वच राजबंद्यांच्या सुटकेची मागणी करणारा ठराव मांडला होता. त्यात सावरकरांचा विशेष उल्लेख होता. २४ फेब्रुवारी १९२0 रोजी ग. श्री. खापर्डे यांनी सावरकरांना सोडावे म्हणून बाजू मांडली होती. १९२१ च्या मार्च महिन्यात केंद्रीय विधिमंडळाचे सदस्य के. व्ही. रंगास्वामी यांनी पण सावरकरांना सोडण्याची मागणी केली. या मागणीला नवाब सर बहरामखान आणि हयातखान या दोन सदस्यांनी विरोध केला. ते म्हणाले, ‘‘सावरकरांना सोडले तर आगीत तेल ओतल्यासारखे होईल.’’ त्यावर अय्यंगार हे सदस्य म्हणाले, की सावरकर बंधूंची हमी मी घेतो.
यादरम्यान सावरकरांच्या सुटकेच्या मागणीपत्रावर सुमारे ८0 हजार स्वाक्षर्‍या गोळा केल्या गेल्या. गांधी आणि नेहरू यांनी मात्र त्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. भारतात अनेक प्रांतांतील वृत्तपत्रांत अंदमानची यमयातना वर्णन करणारे लेख व सावरकरांनी अंदमानातून त्यांचे भाऊ डॉ. ना. दा. सावरकर यांना पाठवलेली पत्रे भाषांतर करून छापली गेली. सावरकरांच्या सुटकेची मागणी वृत्तपत्रे, नेते व काही ब्रिटिश विचारवंतसुद्धा करत होते. परिणामत: सरकारने अंदमान येथील वसाहत बंद करून कैदी भारतात परत आणण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या. सावरकर बंधू वगळता बहुतेक क्रांतिकारकांना भारतात परत पाठवण्यात आले. अखेरीस १९२१ साली ब्रिटिश सरकारने सावरकर बंधूंना अंदमानातून भारतात आणले. (अर्थात भारतातील तुरुंगातही सावरकर बंधूंचे छळसत्र थांबले नाहीच) यावरून हेच निर्विवाद सिद्ध होते, की सावरकरांची अंदमानातून झालेली सुटका जनमताच्या व परिस्थितीच्या रेट्याने झाली.
आणि आता नुकताच कोणालाही नाकारता येणार नाही असा निर्विवाद पुरावा पुढे आला आहे. तो म्हणजे स्वा. सावरकर याच्या कवितांचे १९२१ मधले हस्तलिखित. अंदमानातून सुटका होण्याच्या काही महिने आधी स्वा. सावरकरांना तेल गोदामावर मुकादम म्हणून बढती मिळाली होती. त्या काळात त्यांनी कारागृहातील कोरे कागद एकत्र करून एक वही तयार केली. या वहीच्या आवरणाचा खर्डा कैद्याच्या इतिहास पत्रिका एकमेकांना चिकटवून तयार केला आहे. ही वही दादर येथील स्वा. सावरकर स्मारकात ठेवण्यात आली आहे. याच वहीत सावरकरांच्या दोन अत्यंत देशभक्तीपर उर्दू गझला आणि युवकांना क्रांतीचे आवाहन करणारी एक हिंदी कविता आहे. अंदमानमध्ये हालअपेष्टा भोगत असतानाही ते उर्दू शिकले होते. या रचना पर्शियन आणि देवनागरी या दोन्ही लिपीत स्वा. सावरकरांच्या हस्ताक्षरात आहेत. या कवितेत युवकांना ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठावणी करण्याचे आवाहन करताना सावरकर लिहितात
हन्ता रावण का है अपना राम वीरवर सेनानी, कर्मयोग का देव है स्वयं कृष्ण सारथी अभिमानी!
भारत तेरे रथको सेना कौन रोकनेवाली हैं? फिर देर क्यो, उठो भाई, हमी हमारे वाली है!!
या कवितांमध्ये व्यक्त झालेली जाज्वल्य देशभक्ती आणि क्रांतीची प्रेरणा बघता, जेथे शेकडो कैद्यांनी आत्महत्या केल्या आणि असंख्य कैद्यांना वेड लागले अशा भीषण कारागृहात पन्नास वर्षे शिक्षेची टांगती तलवार डोक्यावर असताना, अत्यंत हालअपेष्टा आणि छळ सोसूनही हा कडवा देशभक्त आपल्या ध्येयापासून जराही विचलित न होता सदैव झगडत राहिला, याबद्दल मनात विस्मय निर्माण झाल्याविना राहत नाही.

No comments:

Post a Comment